Thursday 28 May 2015

योग - भाग ३

योग - भाग १

योग - भाग २

अखेर ऑगस्ट महिना संपत आल्यानंतर गोखले महाविद्यालयात प्रवेश मिळाला. विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. पुढे Engineering करणार हे तर ठरलं होतं, पण बारावीला कमी गुण मिळाले आणि Engineering ला प्रवेश नाही मिळाला तर Backup Plan म्हणून Microbiology ला प्रवेश घेऊ अशा विचाराने PCMB ग्रुप घेतला. फी फक्त दोन हजार रुपये! यादीत नाव न दिल्याने आणि ओळखीने प्रवेश घेतल्याने "इ" तुकडी मिळाली. शेवटून दुसरी. या कॉलेजचं वैशिष्ठ्य म्हणजे इथे फक्त अ आणि ब या दोनच तुकड्यांच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष पुरवले जाई. प्रवेश घेऊन कॉलेजला जाऊन दोनच दिवस होत नाहीत तर महाविद्यालयीन शिक्षकांचा संप सुरु झाला. अकरावी बारावी विज्ञान private tutions ची फी तर मुळीच परवडणारी नव्हती. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात संप मागे घेतला गेला. पण आधीच दीडेक महिन्याचा अभ्यास बुडलेला, नंतर संपाचा दीड महिना, असं करून शिक्षकांनी थेट चार-पाच महिने पुढचं शिकवायला सुरुवात केली.
 
पंधरा दिवस होत नाहीत तर पहिली semester आली त्यामध्ये दोन विषय गेले. गणितात Derivation आणि Integration या नवीन गोष्टी आणि सगळा अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये असल्याने अवघड गेलं सगळं. घरी निकाल समजल्यावर आईची बडबड सुरु झाली ते ही ऐकून घ्यावं लागलं. अकरावीला ३७% गुण मिळवून कसंबसं पास होता आलं तेच महत्त्वाचं वाटलं तिला. PPS शिक्षकांनी कितीही speed मध्ये शिकवलं असतं तरी इतकं नुकसान तर नक्कीच झालं नसतं असा विचार सारखा मनात येई. संपदेखील फक्त महाविद्यालयीन शिक्षकांचा झाला होता. आणि संप नसतानादेखील इ तुकडीकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला होता. 
 
बारावी सुरु झाली. अकरावीच्या टक्केवारीमुळे आता थेट शेवटच्या तुकडीत रवानगी झाली होती. पण शेवटची काय आणि शेवटून दुसरी काय पहिल्या दोन तुकड्यांच्या नंतर परिस्थिती सगळीकडे सारखीच होती. बारावीला तीन-चार मैत्रिणींशी चांगली ओळख झाली. सगळ्यांना चांगल्या tutions असल्याने त्या कॉलेजला फक्त practicals आणि परीक्षेपुरत्याच येत. एक मुलगी मात्र होती जिची घरची परिस्थिती श्वेताशी मिळतीजुळती होती. शर्वरी तिचं नाव. नेहा आणि कृपा यादेखील चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. स्वभाव बुजरा असल्याने श्वेता स्वत:हून कोणामध्ये मिसळायला जायची नाही. तर शर्वरीचा स्वभाव मात्र बोलका होता. कृपादेखील बेधडक स्वभावाची. कृपाशी तिची संस्कृतच्या वर्गात ओळख झाली, ते पण श्वेताला संस्कृतच्या वर्गात दोन-तीन वेळा पाहिल्याने कृपा स्वत:हूनच तिच्याशी बोलली म्हणून. नेहा कृपाची मैत्रीण म्हणून नेहाशीही ओळख झाली.
 
श्वेता आणि कृपा कॉलेजमध्ये थांबून अभ्यास करत बसत. श्वेताला घरच्या कटकटीपेक्षा कॉलेजची Library किंवा LR अभ्यास करायला जास्त बरी वाटे. कधी दोघी मिळून अभ्यास करत तर कधी दोघी आपापला. बारावीचं वर्ष भुरकन उडून गेलं. बोर्डाची परीक्षा जवळ आली. शर्वरी परीक्षेसाठी तिच्या आत्याच्या घरी रहायला आली. आत्याचं घर श्वेताच्या जवळच होतं. परीक्षेला दोघी एकत्रच येत-जात. पेपर संपल्यावर घरी जाताना आजच्या पेपरबद्दल थोडी चर्चा करून पास होण्याइतकी टोटल जुळते का ते बघत आणि उद्याच्या पेपरची कशी तयारी करायची याबद्दल रूपरेषा ठरवत. गणित पेपर - २ शेवटचा पेपर होता. तो झाला आणि शर्वरी भेटली आणि रडायलाच लागली. शर्वरीला ती या पेपरमध्ये नापासच होणार अशी खात्री झाली. श्वेताला तर पेपरमध्ये काय लिहिलंय ते आता मुळीच आठवत नव्हतं, पण अभ्यास एकसारखाच केल्याने तीदेखील धास्तावली.
 
पेपर जसे लिहिले त्यात पास होण्याचीच खात्री नाही तर engineering ला प्रवेश कुठून मिळणार! सगळेच निर्णय चुकत आहेत आणि असं व्हायला नको होतं असं श्वेताला फार वाटे पण आता मागचा विचार न करता सगळ्यातून फक्त पुढे मार्ग काढत जायचं होतं. आयुष्य कोणासाठी थांबत नाही. पण त्याला कोणत्या रस्त्याने पुढे न्यायचं हे आपणच निवडायचं असतं. काहींना नशिबानेच काट्याकुट्याची वाट मिळते. पण पुढे तर जायचंच असतं. न जाणो काही दिवसांनी ऋतू बदलेल आणि काटेरी झाडांनाही फुले येतील!
 
क्रमश:

Tuesday 26 May 2015

योग - भाग २

 
"मग काय करायचं?" - श्वेता 
"मला तरी वाटतं नको घ्यायला इथे प्रवेश" - बाबा. "आणि तसंही प्रवेश घ्यायचाच असेल तर आजच तीन हजार रुपये भरून प्रवेश नक्की करायचा आहे, दुपारी एक पर्यंतच! तेही शक्य होईल असं वाटत नाहीये. शिवाय polytechnic ला प्रवेश घेतला तर इथले पैसे सगळेच्या सगळे परत मिळणार नाहीत."
आता मूळ मुद्दाच समजल्यावर श्वेता पुढे काहीच बोलू शकली नाही. फक्त शहरातल्या सर्वोत्तम Junior college मध्ये शिकता येणार नाही हा सल मात्र राहिला. Polytechnic च्या प्रवेश फेऱ्या अजून सुरूच झाल्या नव्हत्या, त्यामुळे तिथे काय होईल, कोणती शाखा मिळेल काहीच अंदाज नव्हता.
 
अकरावीच्या centralized प्रवेशाची यादी जाहीर झाली. पहिल्या क्रमांकावर PPS नाव दिलं होतं ते अर्थातच मिळालं नाही. दुसऱ्या क्रमांकावर नाव दिलेल्या कॉलेजात मात्र सहज प्रवेश मिळत होता, तिथे प्रवेश ७५% ना बंद झाला होता. दुसऱ्या दिवशी कॉलेजात प्रवेश घेण्यासाठी गेल्यावर समजलं की तिथली फी सहा हजाराच्या आसपास आहे. झालं, आली परत पंचाईत. वडिलांनी आता पुन्हा दुसरं कारण पुढे केलं की, "हे कॉलेज रोजच्या प्रवासाच्या दृष्टीने सोयीस्कर नाही, तू रोज इतक्या दूर कशी ये-जा करणार? त्यापेक्षा गोखले महाविद्यालयात आपली ओळख आहे. तिथे बघू आपण प्रवेशाचं काहीतरी."
"पण बाबा, आपण तर यादीमध्ये गोखले महाविद्यालयाचं नाव दिलंच नाहीये, मग कसा मिळेल तिथे प्रवेश?"
"मिळेल, तू नको काळजी करूस."
 
एव्हाना polytechnic च्या फेऱ्याही सुरु झाल्या. तिसऱ्या फेरीनंतर श्वेताचं नाव यादीत वर वर सरकू लागलं. लेडीज कोटा होताच. तिला या "लेडीज कोटा" प्रकाराबद्दल फार गंमत वाटे. आपण कोणीतरी स्पेशल ट्रीट केलं जातोय याचाही आनंद होताच, पण यातून का होईना प्रवेश नक्की मिळेल ही खात्री होती. आणि शेवटी मुलाखतीचा दिवस उजाडला. Mechanical शाखा मिळत होती. सर्वांनी आधीच सांगितलं होतं की civil/mechanical असं काही घेऊ नको, मुलींसाठी तिथे फार स्कोप नसतो. श्वेताला तर Computer किंवा Electronics च हवं होतं. तिथल्या सरांनी सांगितलं की, या शाखांसाठी ६व्या फेरीपर्यंत थांबावं लागेल. आणि तेव्हादेखील इतरांनी आपला प्रवेश रद्द केला तरच नंबर लागेल. दुसरा पर्याय असा आहे की, पहिल्या वर्षाचा सर्व शाखांचा अभ्यासक्रम सारखाच असतो, तेव्हा पहिल्या वर्षात ज्यांना आरक्षणामुळे किंवा payment seat मुळे प्रवेश मिळाला आहे, त्यांना अभ्यासक्रम झेपला नाही, आणि ते पहिल्या वर्षात नापास झाले, तर इतर शाखेच्या toppers ना दुसऱ्या वर्षी हवी ती शाखा बदलून मिळेल. सगळा नशिबाचाच भाग, पण पुन्हा एकदा पाचेक हजार रुपये त्याच दिवशी भरायची वेळ आली आणि नशिबापुढे पैसा पुन्हा एकदा वरचढ ठरला. 
 
ना अकरावीसाठी हवं होतं ते कॉलेज मिळालं, ना preference यादीमध्ये नाव दिलं होतं तिथे प्रवेश घेतला, ना polytechnic ला. जणू तिच्या आयुष्याचीच नकारघंटा वाजायला लागण्याची सुरुवात होती ही. अर्थात तिची सकारात्मक विचारशक्ती मात्र तिच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नव्हतं, ना नशीब, ना पैसा!
 
क्रमश:

Monday 25 May 2015

योग - भाग १

तसं दोघांचं दूरचं नातं लागत होतं एकमेकांशी. श्वेता आठवी-नववीत असताना तिने त्याला पहिल्यांदा पाहिलं. छान गोरापान उंचापुरा होता तो, तर ती तशी दिसायला सुमार! तोही अकरावी-बारावीत असेल तेव्हा, निखिल सरपोतदार. निखिल नाशिकचा त्यामुळे पुण्यात येणंजाणं तसं कमीच व्हायचं. पण ती ज्या घरात राहत होती तिथल्या आजीबाई त्याच्या आईच्या मावशी. त्यामुळे पुण्यात आल्यानंतर भेट तर व्हायचीच.  आला की त्याचं तिच्याबरोबर पेपर मधली शब्दकोडी सोडवणं, तिच्या लहान भावाबरोबर सुमीतबरोबर बुद्धिबळ खेळणं, सगळ्यांशी हसून, मिळून मिसळून बोलणं तिला छान वाटायचं. येउन गेला की एखाद-दोन दिवस त्याची आठवण मनात रुंजी घालायची, की परत त्याच्याबद्दल ती विसरून जायची. निखिलचा बारावीचा निकाल लागल्यावर पुण्यात Engineering च्या प्रवेशासाठी म्हणून त्याच्या वडिलांबरोबर आला तो. पण गुण कमी असल्याने प्रवेश काही मिळाला नाही.

तिच्या आई-वडिलांचं एकमेकांशी मुळीच पटायचं नाही. घरच्या बेताच्या परिस्थितीला श्वेताचे वडीलच कारणीभूत असल्याचं आईचं ठाम मत, आणि कित्येक लहान-सहान कारणांवरून घरात कायम कलह. सरकारी नोकरीच्या हव्यासापायी वडिलांची छोट्या-मोठ्या नोकऱ्यांमध्ये धरसोड, पर्यायाने सतत उधारी-उसनवारी पाचवीला पुजलेली! कसाबसा आजीबाईंनी राहण्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी आसरा दिलेला तीच काय ती जमेची बाजू.

श्वेताची दहावीची परीक्षा पार पडली. घरी इतर लहान मुलांच्या शिकवण्या घेणं, पुस्तकांच्या घड्या घालायचं काम आणलं की ते करणं, शाळेत तीन किलोमीटर रोज चालत येणं-जाणं. आईला तात्पुरती नोकरी मिळाली की घरातही सगळं काम करणं आणि सुमीतचाही अभ्यास घेणं अशा धांदलीत देखील दहावीला ७९% गुण मिळवले. घरची परिस्थिती बेताचीच, त्यामुळे कुठे प्रवेश घ्यावा याबद्दल तिच्याही मनात संभ्रमच होता. Diploma in Engineering साठी Government Polytechnic मध्ये एका मामाच्या मदतीने Form भरला. अकरावी Centralized प्रवेशासाठी देखील Form भरला.

PPS ची विद्यार्थिनी असल्याने PPS मध्ये  ८५ टक्क्यांना प्रवेश बंद झाला असला तरी तिला शाळेचीच विद्यार्थिनी म्हणून प्रवेश मिळणार होता. PPS शहरातली एक नावाजलेली शाळा, इथे Junior college ला प्रवेश मिळण्यासाठी प्रत्येकाची चढाओढ लागे, PPS चा विद्यार्थी म्हणजे हुशार असं समीकरणच होतं. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तिने form मध्ये college preference दिला. PPS मध्येच प्रवेशाची तिची खूप इच्छा होती. ज्या दिवशी PPS मध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या बाबांनी येउन निरोपही दिला. मग हट्ट करून तिने बाबांना शाळेत नेलं. बाबा Prinicipal च्या ऑफिसमध्ये गेले आणि काही वेळाने बाहेर आले.

श्वेताने विचारलं "काय झालं, प्रवेश नक्की झाला का?"
बाबांनी काहीच उत्तर न देता आत काय झालं ते सांगायला सुरुवात केली आणि म्हणाले, "तुमच्या सरांनी आतमध्ये आम्हा १५ जणांना एक लेक्चर दिलं, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की  इथे शाळेतली १०-१२ मुलंच प्रवेश घेऊ शकतील, ज्यांना ७७ टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत ती! पण इतर २०० मुलं सगळी ८५-९० टक्क्यांच्या पुढची असणार आहेत, शिक्षकदेखील त्या स्पीडने शिकवणार आणि त्यांच्याबरोबर या मुलांना जुळवून घ्यायला कठीण जाईल असं आमचं आजपर्यंतचं निरीक्षण आहे. आता याउपरही तुम्हांला इथेच प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता."

क्रमश: